अहमदनगर : राज्यातील शेतकरी नेहमी संकटात असतो. पीकाला हमीभाव नसल्याने त्याची कधीच म्हणावी अशी प्रगती होत नाही. सतत भाऊबंदकी, चोरांचा सामना करावा लागतो. शेतीतील विजपंप, जनावरे चोरली जातात, झाडे कापली जातात. अशातच शेवगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याची सिताफळाची बाग अज्ञाताने खोडासह कापल्याची संतापजनक घटना घडली आहे.
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील शेतकरी अशोक म्हस्के यांनी दोन वर्षांपूर्वी उसनवारीने पैशे घेऊन दीड एकर क्षेत्रात सिताफळीची लागवड केली होती. मात्र, शुक्रवारी (ता. 27) शेतकरी म्हस्के सकाळी शेतात गेले असता त्यांना बागेतील झाडे कापल्याचे दिसले. अज्ञाताने म्हस्के यांच्या शेतीतील तब्बल शंभरहून अधिक झाडे कापली. याप्रकरणी शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून दोषींविरुद्ध कडक करवाईची मागणी केली आहे.
म्हस्के यांच्या दीड एकर क्षेत्रातील सहाशे झाडांपैकी शंभरहून झाडे खोडापासून कापून टाकली आहेत. पोलिसांत तक्रारीनंतर पोलीस अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस करत आहेत. दोषींविरूद्ध कडक कायदेशीर कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाने भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.