मुंबई : सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची चौकशी करण्यात येणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते. देशमुख यांनी हे जाहीर केल्यानंतर भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत देशमुख यांची करोनावरून टिंगल उडवली. भातखळकर यांनी केलेल्या ट्विटवरून आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेत्यांचे संस्कारांवरच बोट ठेवले आहे.
अनिल देशमुख यांनी चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केल्यानंतर भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी करोनाचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली. भातखळकर यांच्या ट्विटवर नाराजी व्यक्त करत रोहित पवारांनी भाजपा नेत्यांच्या संस्कारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“विद्वान व्यक्ती नम्र असते अन पोकळ व्यक्ती उथळ पाण्यासारखं खळखळ करते! भाजपाच्या नेत्यांसह अनेकांना करोना झाला, तेव्हा त्यांना बरं होण्यासाठी आम्ही शुभेच्छा दिल्या. भाजपाचे उथळ नेते शुभेच्छा देतच नाहीत, पण करोनामुळं मेंदूवर परिणाम होत असल्याचं बरळत आपले संस्कारच दाखवून देत आहेत,” अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे राज्याच्या राजकारणातही पडसाद उमटत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आंदोलनासंदर्भात ट्विट करण्यात आल्यानंतर देशातील क्रीडा आणि कला क्षेत्रातील सेलिब्रिटींनी ट्विट करत भाष्य केले होते. सेलिब्रिटींनी मोदी सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केल्याचा सूर सोशल माध्यमांवर उमटला. काही जणांच्या ट्विटमध्ये साधर्म्य असल्याचं सांगत काँग्रेसनं ट्विट प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशी करण्यात येईल अशी माहिती दिली.