नवी दिल्ली – आम आदमी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याबद्दल पीडीपीच्या नेत्या महबुबा मुफ्ती यांनी कॉंग्रेसवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम आदमी पक्षाच्या समर्थनार्थ कॉंग्रेसने सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून त्यांना समर्थन देण्याची गरज असताना त्यांनी त्या पक्षाच्याच विरोधात निदर्शने केली.
मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे की कॉंग्रेसचे नेतेही ईडीच्या कारवाईचे बळी ठरले होते याची त्यांनी जाणिव ठेवायला पाहिजे होती. कॉंग्रेस आपल्या हितसंबंधांच्या बाहेर येत नाही याचे वाईट वाटते. आपच्या नेत्यांवर भाजपने दुष्टपणाने कारवाई करूनही कॉंग्रेस भाजपच्याच मोहीमेत सामिल होत आहे असा आरोपहीं त्यांनी केला.
ज्यावेळी ईडी सारख्या यंत्रणांचा वापर करून सर्वच विरोधकांना लक्ष्य केले जात असेल तर त्याच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांने एकत्र येण्याची गरज आहे ही बाब कॉंग्रेसने ध्यानात घ्यायला हवी होती असेही मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.
तथापि मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याला कॉंग्रेस नेते मणिकम टागोर यांनी प्रत्युत्तर दिले असून त्यांनी म्हटले आहे की सिसोदिया यांची टोळी भ्रष्ट कृत्य करताना पकडली गेली आहे. त्यांना योग्य तो धडा मिळायलाच हवा होता. ज्यांनी भ्रष्टाचार केल्याचे उघड होत आहे त्यांना सुरक्षित मार्ग का द्यायचा असा सवालही त्यांनी केला आहे.
ते म्हणाले की युपीए सरकारच्या काळात याच लोकांनी आमच्या प्रामाणिक नेत्यांवर चिखलफेक केली होती. सन 2012 साली अण्णा हजारे आणि केजरीवालांनी युपीए सरकारच्या विरोधात जे आंदोलन केले होते त्या अनुषंगाने खासदार टागोर यांनी ही टीका केली आहे.