पुणे – गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यांचा निषेध करत, “पवारांनी थोडी तरी सभ्यता पाळायला हवी होती,’ असे मत भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी मंगळवारी व्यक्त केले.
भाजपच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत भांडारी बोलत होते. “यापूर्वीसुद्धा राहुल गांधी हे पर्रीकर यांची प्रकृती बिघडलेली असताना त्यांना भेटायला गेले होते. यानंतर राहुल गांधी यांनी बेताल वक्तव्य केले होते. त्यानंतर आता शरद पवार यांनी केले आहे. याला सभ्यता म्हणत नाहीत. मृत्यूनंतर एखाद्याबाबत अशी टीका योग्य वाटत नाही,’ असेही भांडारी म्हणाले.
“शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक प्रयत्न नरेंद्र मोदी सरकारने केले आहेत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आमच्याच सरकारने लागू केल्या. त्याचा परिणाम आपल्याला लवकरच दिसून येईल. फक्त शेती क्षेत्र नाही, तर आम्ही पाच वर्षांपूर्वी जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली, त्यातील 73 टक्के आश्वासने पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी झालो. काही आश्वासने मार्गी लागली आहेत, तर काहींची कामे सुरू आहेत. जाहीरनाम्यातील प्रत्येक कामांचा लेखाजोखा योग्य वेळ आली की मी देईल, असेही भांडारी म्हणाले.
“2014 मध्ये भाजप सेनेची राज्यात जेवढी ताकद होती, तेवढीच आता कायम असल्याने आम्हाला जास्तीत जास्त जागा मिळतील,’ असेही भांडारी यांनी सांगितले. “राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे मनोरंजन कार्यक्रम असल्याने गर्दी होत असल्याचेही’ त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.