नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इथून पुढे आयुष्यात कधीही भाजपबरोबर जाणार नसल्याचे वक्तव्य केलं. सध्या आपण जिथे आहोत तिथेच एकत्र राहून, बिहार आणि देशाची प्रगती करू असेदेखील नितीश कुमार यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान, नितीश कुमार यांनी एका जाहीर कार्यक्रमात भाजपवर जोरदार टीका केली.
समस्तीपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचे लोक फालतू बोलतात. त्यांचे नेते चुकीची वक्तव्य करत आहेत. भाजप केवळ समाजात संघर्ष निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यांचा देशाच्या विकासाशी काहीही संबंध नसल्याचे नितीश कुमार म्हणाले. भाजपवाल्यांनी केवळ भांडण लावण्याचे काम केल्याचे नितीश कुमार म्हणाले.
आजकाल भाजपचे लोक माझ्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करत आहेत. अटलबिहारी वाजपेयी असोत, लालकृष्ण अडवाणी असोत की मुरली मनोहर जोशी या सर्वांनी देशाच्या विकासासाठी खूप काम केले आहे. पण आज जे केंद्रात बसले आहेत त्यांना विकासाचे काहीच देणं घेणं नसल्याची टीका नितीश कुमार यांनी भाजपवर केली.
बिहारमधील अभियांत्रिकी महाविद्यालय पाटणा ही देशातील सर्वात जुनी संस्था आहे. मी त्याचा विद्यार्थी आहे. 1998 मध्ये जेव्हा अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी अटलबिहारी बाजपेयींनी मला केंद्र सरकारमध्ये मंत्री केले. त्यावेळी केंद्र सरकारने तीन विभागांची जबाबदारी सोपवली होती. आपण सर्वांनी मिळून देशाच्या प्रगतीसाठी खूप काम केले, पण आज केंद्रात बसलेल्या लोकांना विकासाची कोणतीही चिंता राहिली नसल्याचे नितीश कुमार म्हणाले.