शेवगाव – शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे प्रतिनिधी सरकारमध्ये नसल्याने पाच वर्षात शेतकऱ्यांची व्यथा त्यांना समजलीच नाही. त्यामुळे जागृतपणे मतदान करून या सरकारला आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्याची वेळ आली आहे, असे आवाहन माजी आमदार चंद्रशेखऱ घुले यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ तालुक्यात ठिकठिकाणी झालेल्या कोपरा बैठकीमध्ये घुले बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, रमेश कापरे, चंद्रभान झाडे, बाळासाहेब आगळे, सर्जेराव निकम गुरूजी, सुर्यभान झाडे, सर्जेराव सातपुते, सुदाम झाडे, नंदु नजन आदी प्रमुख उपस्थित होते.
घुले म्हणाले, सामनगाव हे स्व. मारुतरावजी घुले यांच्या विचारावर चालणारे, निष्ठा ठेवणारे गाव आहे. आजपर्यंत या गावाने घुले कुटूंबावर प्रेमच केलेले आहे. मात्र सध्याच्या लोकप्रतिनिधींना टेलला असलेल्या गावापर्यंत पाणी देता आलेले नाही. दुष्काळामध्ये शेतकरी व सर्वसामान्य नागरिक होरपळत असतांना जनावरांच्या छावण्याबाबतही राजकारण केले जात आहे. शेतकऱ्यांची जाण असलेल्या शरद पवार यांनी केंद्रात कृषीमंत्री असतांना 73 हजार कोटी रुपयांची सरसकट वीनाअट कर्जमाफी केली. आता पवार सरकारमध्ये नसल्यामुळेच शेतकऱ्यांची वाताहात झालेली आहे. दुधाला, शेतमालाला भाव नाही, पिण्यासाठी पाणी नाही अशी स्थिती असतांना सरकारला याचे गांभिर्य नाही.
संजय कोळगे, रमेश कापरे, बाळासाहेब आगळे यांचीही भाषणे झाली. यावेळी रेवनाथ नजन, ग्राम पंचायत सदस्य शिवाजी कापरे, अमोल नजन, श्रीधर सातपुते, पोपट झाडे, सेवा संस्थेचे चेअरमन रविंद्र सातपुते, देवदान कांबळे, नंदकुमार नजन, आदिनाथ झाडे, दत्तात्रय नजन, हरिभाऊ काळे, विक्रम कळकुंबे, गोकुळ पठाडे, कैलास कराळे, नौशाद शेख, राजू शेख, आदिनाथ कापरे, कृष्णा सातपुते, अशोक कापरे, भाऊसाहेब गवळी, बाजीराव कोकाटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.