– शंकर दुपारगुडे
कोपरगाव (प्रतिनिधी) : माणसांच्या आशा ही वाईट असते. गेल्या दिड महिन्यापासून करोनाच्या भितीने घरात कोंडून घेतलेल्या नागरिकांना शासनाच्यावतीने दिलासा दायक निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. प्रसारमाध्यमातून मद्यप्रेमींना खुश करणाऱ्या बातम्या प्रसारित झाल्या बरोबर मरगळलेल्या मद्यप्रेमींना तरतरी आली. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात अहमदनगर जिल्ह्यातील सर्व छोटे दुकाने व वाईन शॉप सुरू होणार असे समजताच ४ मे हा दिवस म्हणजे सुवर्ण सकाळ वाटू लागला. कधी दिवस उजडेल आणि दारुच्या बाटल्या मनसोक्त घेवून मनसोक्त रिचवू या स्वप्नात काहींनी रात्र काढली पण सकाळी दारुच्या बाटल्या विकत घेण्यासाठी आलेल्यांना पोलीसांच्या काट्या खावून परतावे लागले.
मद्यप्रेमींची झाली घोर निराशा…
करोना, संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर गेल्या तालुक्यातील मद्य विक्रीचे दुकाने बंद आहेत मात्र काल दुपारी राज्य शासनने मद्याविक्रीचे दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तळीरामांच्या आनंदाला आकाश ठेंगणे झाले. काही मद्यप्रेमींनी दारु दुकानदाराचे हार- फुलांनी स्वागत करण्याच्या निश्चय केला होता. मात्र हा आनंद काही तासांचा ठरला रात्री अचानक जिल्हा प्रशासनाने मद्य विक्री संदर्भात स्पष्ट आदेश स्थानिक प्रशासनाला दिले नाहीत. त्यात उत्पादन शुल्क विभागाने रात्री उशिरा स्वतंत्र आदेश काढून दारुचे बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे मद्य प्रेमींची अवस्था म्हणजे कभी खुशी…. कभी गम अशी झाली.
लॉकडाउनमुळे नियमीत मद्यप्राशन करणाऱ्या तळीरामांच्या जीवाची घालमेल सुरू झाली. विदेशी पिणारे देशीवर आले तर देशी पिणारे हातभट्टीवर जावू बसु लागले. कधी नव्हे ते चांगले दिवस हातभट्टीवर दारु विकणाऱ्यांना आले आहे. त्यांच्या पाण्यालाही अमृतासमान मद्यपी मानत आहेत. दरम्यान तालुक्यात दोन तळीरामापैकी एकाने आत्महत्या केली असल्याची शहरात चर्चा सुरू होती तर दुसरा नैराशेतून वीज वितरण कंपनीच्या खांबावर चढल्याने परिसरातील नागरिक व वीज अधिकाऱ्यांची मोठी धांदल उडाली होती.
करोनामुळे राज्यात लॉकडाउन केल्याने गेल्या 45 दिवसापासून दारुचे दुकाने बंद आहेत, हाताला काम नाही पोटात दारू नाही, बाहेर फिरायला बंदी. तळीराम मित्रांच्या भेटी गाठी, बैठका नाहीत, नेहमी दारु पिण्याची सवय असलेल्यांच्या अंगाचा थरकाप होत आहे . चिडचिड करीत घराच्या खिडक्यातून डोकावत आहेत. दररोज दारुच्या नशेत तर्रर होवून झिंगणाऱ्या तळीरामांची यामुळे मोठी पंचायत झाली. सोमवारी शहरात अनेक नागरीकांना पोलीसांनी आडवून बाहेर फिरण्याचे कारण विचरले असता ते सांगतात कि कपड्याचे दुकान उघडणार असे समजल्याने अंतरवस्त्र खरेदीसाठी आलोय. मात्र पोलीसी खाक्या दाखवल्या नंतर सत्य समोर आल्याने पोलिसांना हसावे कि मारावे हे कळत नव्हते.
पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी रस्त्यावर फिरणाऱ्यांची चांगलीच धुलाई केली. बाजारपेठ खुली होणार म्हणून आलेल्या अनेकांची निराशा झाली तर छोटे व्यवसायीक आपल्या दुकानाच्या आडोशाला बसुन कधी दुकान उघडण्याची परवानगी मिळते या प्रतिक्षेत होते. तालुक्याच्या शेजारील जिल्हे तालुके करोनाच्या संसर्गाने रेड झोन मध्ये असल्याने कोपरगाव तालुक्याची बाजारपेठ खुली करणे नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे.