नवी दिल्ली- संपूर्ण भारतीय कलाविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या अत्यंत मानाच्या 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली आहे. दिल्लीतील शास्त्री भवनात हा कार्यक्रम पार पडला. दरवर्षी हा सोहळा 3 मे ला होतो. यामध्ये 23 नाॅन फिचर तर 31 फिचर चित्रपटांना पुरस्कार देण्यात आला आहे.
यामध्ये ‘अंधाधुन’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा बहुमान मिळवला आहे. तर, गतवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित आणि निर्मित ‘भोंगा’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे.
दरम्यान, नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ या चित्रपटाने सुद्धा दोन पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. या चित्रपटातल्या ‘चैत्या’ची भूमिका साकारणाऱ्या श्रीनिवास पोफळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला. तर याच चित्रपटासाठी दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवला आहे.