मुंबई – मंगलप्रभात लोढा हे मुंबईचे सहपालकमंत्री आहेत. ते नेमक्या कोणत्या गोष्टीचा निषेध करत आहेत, अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. सत्ताधारी निव्वळ नाटक करत आहेत. खरं तर मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचे. ज्या यंत्रणेने या मंदिराला धक्का लावला ती यंत्रणा अर्थात मुंबई महानगरपालिका देखील मुख्यमंत्री कार्यालयातून चालवली जाते. तसेच अधिकाऱ्याची बदली झाली, पण मंत्र्यावर कारवाई कधी होणार असा सवाल ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
मुंबई उपनगरातील विलेपार्ले भागातील एका पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर मुंबई महापालिकेकडून पाडकाम कारवाई करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या या कारवाईनंतर देशभरातील जैन समुदायाकडून याचा तीव्र निषेध करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या या कारवाई विरोधात शनिवारी जैन समाजाकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. यावरूनच आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, विलेपार्ले येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर दोन दिवसांपूर्वी महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. नेमिनाथ कोऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी परिसरात हे मंदिर होते. हे मंदिर 90 वर्ष पुरातन असल्याची माहिती समोर येते आहे. या निषेध मोर्चात भाजप नेते आणि मंत्री देखील सहभागी होते. विशेष म्हणजे, भाजप आमदार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई उपनगराचे सह पालकमंत्री आहेत.
या मंदिरावर कारवाई करणारी यंत्रणा मुख्यमंत्री कार्यालयातून चालते. आणि ते ज्या जिल्ह्याचे सहपालकमंत्री आहेत, तिथल्याच परिसरात ही कारवाई झाली आहे, हे सांगताना ते नेमका कोणत्या गोष्टीचा निषेध करत आहेत, अशी विचारणा त्यांनी केली आहे. पालिकेला सांगायचा त्यांना पूर्ण हक्क होता, की केस ऐकली जाईपर्यंत कारवाई करू नये. तसे त्यांनी का केले नाही, असा सवालही त्यांनी केला.