नवी दिल्ली – सध्या करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असून प्रत्येक नागरिक घरी राहण्याचा प्रयत्न करीत आहे. या लॉकडाऊनच्या काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणणे शक्य नाही. शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत केंद्र सरकारने ही माहिती दिली. यावेळी केंद्र सरकारने सांगितले देशामध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोनाचे संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यावर सध्या आमचे लक्ष आहे. जेणेकरून कोरोनाचा धोका कमी होईल.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे सर्व आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद आहे.अशामध्ये परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत परदेशात अडकलेल्या नागरिकांना भारतात आणणे शक्य नाही. त्यामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना त्याठिकाणीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांना त्याठिकाणीच सर्व मदत केली जात आहे. दरम्यान, बांगलादेशमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले ५८१ भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना भारतात आडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारने सांगितले आहे.