कोल्हापूर – सध्या महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग असल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची नुकतीच भेट असून, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जातायत. दरम्यान, स्वतः छत्रपती संभाजी राजे यांनी आपण मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी भेट घेतली असल्याचं सांगितलं आहे. या संदर्भातील एक पोस्ट देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
यामध्ये संभाजीराजे यांनी पोस्टमध्ये म्हंटलय, “तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन व विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली. राव यांनी केवळ निवडणुकीपुरती आश्वासने न देता अथवा केवळ राजकीय दृष्टिकोन ठेवून कार्य न करता जनहित व राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून व्यापक कार्य आपल्या राज्यात केले आहे.
राव यांनी गेल्या १४ वर्षांत तेलंगणा राज्यात विकासाची गंगा आणली आहे. त्यांचे कृषीधोरण, जनधोरण, सिंचन योजना, गरीब व वंचितांसाठी आखलेल्या विविध योजना व शिक्षण पद्धती या संपूर्ण देशासाठी मार्गदर्शन व आदर्शवत आहेत. त्यांच्या या योजना व कार्यपद्धती याविषयी प्रदीर्घ चर्चा झाली.
राव हे केवळ आपल्या राज्यापुरते मर्यादित न राहता इतर राज्यांच्या विकासाचा व त्यामाध्यमातून संपूर्ण राष्ट्राचा विकास साधण्याचा दूरगामी दृष्टिकोन ठेवणारे अत्यंत ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी आपल्या निवासस्थानी अगदी आपुलकीने आदरातिथ्य केले.
छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांना पूर्ण अभ्यास असून महाराजांविषयी त्यांच्या मनात अत्यंत आदरभाव जाणवला. यावेळी राव यांना राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचा चरित्रग्रंथ भेट दिला.’ असं म्हणाले आहेत.