मुंबई – महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी होत आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार हे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार असल्याचे म्हंटले जात आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे अंदाज वर्तवले आहेत. दिल्लीत आणि दुसरा महाराष्ट्रात असे दोन राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे यांना अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, “माझ्याकडे गॉसिपसाठी वेळ नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खूप काम आहे. मला याविषयीची काहीही माहिती नाही. अजितदादा हा मेहनत करणारा माणूस आहे त्यामुळे त्याच्या विषयी चर्चा होत आहेत. राज्यात अनेक समस्या आहेत, राज्यात कामं होत नाहीत त्यामुळे काही कार्यक्रम रद्द करून अजित पवार गेले होते. एक कार्यक्रम रद्द केल्याने काही होत नाही.”
काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी पंधरा दिवसात राज्यात राजकीय भूकंप होईल असं सांगितले होते. असे विचारल्यानंतर एक नाही तर दिल्लीत आणि महाराष्ट्रात असे दोन राजकीय भूकंप होणार असल्याचा सुप्रिया सुळे यांनी दावा केला. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार ही चर्चा सध्या सुरू असतानाच सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.
या आधीही सुप्रिया सुळे यांनी अजित पवार नाराज असलेल्या चर्चांवर स्पष्ट सांगितले होते की, “छत्रपती संभाजी नगर येथील महाविकास आघाडीच्या सभेत जयंत पाटील यांचे भाषण झाले नाही. याचा अर्थ असा नाही की ते रागावले आहेत. महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभेत दोनच लोक बोलायचे हे आधीच ठरले होते. तसेच अजित पवार नाराज असल्याच्या या सर्व अफवा आहेत. ज्या झाडांना जास्त फळे येतात, त्या झाडांवरच दगडफेक केली जाते,.”