औरंगाबाद : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तर काही जण पक्षांतर करताना पहायला मिळत आहे. त्यातच आता देशात ज्याप्रमाणे भाजपला विरोधी पक्षनेता उरला नाही तसेच आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विरोधी पक्षनेता नसेल, असास दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पोहचली त्यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात विरोधी पक्षनेता नव्हता तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाला सरकारच्या विरोधात नेता उभा करता येईल एवढ्यासुद्धा जागा जिंकता आल्या नाहीत. अशीच अवस्था राज्यातही होणार आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची राज्यात सत्ता तर सोडाच पण त्यांचा विरोधी पक्षनेता सुद्धा नसेल असा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. तसेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत राहण्यासाठी कोणीही तयार नाहीत, त्यांची मुजोरी आजपर्यंत लोकांनी सहन केली त्यामुळेच जनतेने त्यांना नाकारले असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटले.