नवी दिल्ली – टाटा समूहातील व्यवस्थापन यंत्रणेत कसलेही बदल करण्याचा विचार नाही असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे वृत्त माध्यमात येत असल्याबद्दल टाटा ट्रस्ट कंपनीचे अध्यक्ष रतन टाटा यांनीही नापसंती व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या वृत्तामुळे समूहातील सुरळीत कामकाजावर विनाकारण परिणाम होतो असे टाटा यांनी म्हटले आहे.
टाटा सन्सच्या व्यवस्थापनपद्धतीत बदल केला जाणार असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केला जाणार असल्याचे वृत्त गेल्या दोन दिवसापासून वृत्त माध्यमात फिरत होते. मात्र चंद्रशेखरन म्हणाले की, या संदर्भात टाटा समूहमध्ये कसलीही चर्चा चालू नाही. प्रकाशित झालेले वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या टाटा सन्सच्या अध्यक्ष पदावर एन चंद्रसेखरन आहेत. टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदावर रतन टाटा असून टाटा ट्रस्टची टाटा सन्स कंपनीत 66 टक्के इतकी गुंतवणूक आहे. टाटा समूहात जवळजवळ शंभर कंपन्या असून त्यांची वार्षिक उलाढाल 106 अब्ज डॉलर इतकी असून या समूहात साडेसात लाख लोक काम करतात.