नवी दिल्ली – करोनाचे संकट असून ते कधी संपुष्टात येईल हे देखील कोणी सांगू शकत नाही. हा धोका संपला तरीही खेळाडूंना पुढील काळात जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. करोनामुळे येत्या काळात जागतिक क्रिकेटमध्ये देखील खूप बदल होतील, असे मत माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे.
आता करोनाचा धोका ओळखून खेळाडूंनी आपली काळजी घेत धोका समोर ठेवूनच सामने खेळावे. हा दृष्टिकोन बाळगला तर खेळाडूंची मनस्थिती सकारात्मक होईल. पुढील काळात क्रिकेट सुरू झाले तरीही खेळाडूंना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावेच लागणार आहे. तसेच चेंडूची चकाकी टीकून राहावी यासाठी आता लाळ लावता येणार नाही. म्हणजेच जागतिक क्रिकेटमध्ये अनेक बदल होणार आहेत. त्यासाठी आतापासूनच खेळाडूंनी सज्ज राहावे, असेही गंभीरने सूचित केले.
जे खेळ वैयक्तिक कामगिरीवर खेळले जातात त्यांना शक्य आहे मात्र, जे खेळ सांघिक आहेत त्यात प्रत्येक वेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे सातत्याने शक्य होणार नाही. हा देखील विचारात घ्यावा असा मुद्दा आहे. खेळाडूंनी हस्तांदोलन केले नाही, आलिंगन दिले नाही किंवा एकत्र येत यशाचा जल्लोष केला नाही तर खेळातील सगळी मजाच निघून जाईल. करोनाचा धोका आहे म्हणून विनाकारण घाबरून जायचे हे योग्य नाही. उलट हा धोका लक्षात घेत, स्वतःची काळजी घेत सामने खेळण्याची मानसिकता वाढवावी, असेही गंभीरने सांगितले.