मुंबई – राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी होताना दिसून येत आहे. त्यातच काल याच मुद्द्यावरून विधानसभेत सीमावादावर प्रस्ताव मांडण्यात येणार होता. मात्र, हा प्रस्ताव मांडण्यात येणार नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
काल विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात विरोधकांनी सीमावादाच्या मुद्द्यावरून केली होती. दरम्यान, सीमावादावर विरोधकांनी प्रस्ताव मांडण्याची मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात उपस्थित नसल्याने हा प्रस्ताव उद्या म्हणजेच, मंगळवारी सभागृहात मांडणार असल्याची माहिती दिली होती.
त्यामुळे आज (मंगळवार) विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनच्या आठव्या दिवशी सीमाप्रश्नावरून पुन्हा एकदा खडाजंगी होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येणार असून आक्रमक पवित्रा घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकेवर विरोधकांनी काल गोंधळ घालून सभात्याग केला होता.