सातारा – ग्रामसेवक हा ग्रामीण विकासाचा कणा असला तरी एकाच तालुक्यात एकाच गावात ग्रामसेवक जास्त काळ नोकरी करत असल्याने तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर एका तालुक्यात दहा किंवा दहापेक्षा जास्त वर्षे सेवा करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या प्रशासकीय बदल्या करण्याचा धाडसी निर्णय जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे प्रस्थापिक ग्रामसेवकांना जोरदार दणका बसणार आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील बदल्यांची प्रक्रिया बुधवारपासून सुरु होत आहे. पहिल्याच दिवशी ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार होत्या. ग्रामसेवकांच्या बदल्या विनंती, आपसी बरोबर प्रशासकीय पण कराव्यात असा निर्णय विनय गौडा यांनी घेत बुधवारच्या ग्रामपंचायत विभागाच्या बदल्या स्थगित केल्या आहेत. आता या बदल्यांसाठी नव्याने वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. एका गावात किंवा तालुक्यात दहा किंवा दहापेक्षा जास्त वर्षे सेवा बजावलेल्या ग्रामसेवकांच्या प्रशासकीय बदल्या करण्याचे आदेश गौडा यांनी दिले आहेत.
सातारा जिल्ह्यात 1495 ग्रामपंचायती असून 837 ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक कार्यरत आहेत. कोरेगाव 81, खटाव 71, माण 55, फलटण 74, खंडाळा 39, वाई 60, जावळी 67, महाबळेश्वर 44, कराड 104, पाटण 129 अशी ग्रामसेवकांची नेमणूक आहे. काही ग्रामसेवकांकडे दोन तर काही ग्रामसेवकांकडे तीन गावे देण्यात आली आहेत.
दि. 31 जुलै 2020 च्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांच्या प्रशासकीय बदल्या होणार होत्या. मात्र, करोना प्रादुर्भावामुळे या बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. आता शासनाच्या धोरणानुसार प्रशासकीय बदल्या होणार आहेत. काही ग्रामसेवक विशिष्ट गावात, एकाच तालुक्यात जास्त काळ सेवा बजावत असल्याने राजकीय हस्तक्षेप होऊन त्यांच्याकडून पक्षपातीपणा होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय बदल्या करण्याचा निर्णय विनय गौडा यांनी घेतला आहे.