मदन भोसलेंच्या पाठपुराव्याने वाई, खंडाळा, महाबळेश्वरमधील प्रश्न मुख्यमंत्र्यांकडून मार्गी
कवठे – महाराष्ट्राच्या जडणघडणीची साक्षीदार असलेल्या आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीला हातभार लावणाऱ्या थोरांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आणि वाईसोबत तमाम सातारा जिल्हा आणि महाराष्ट्राचा अनमोल ठेवा असणाऱ्या प्राज्ञ पाठशाळेच्या ऐतिहसिक ठेवा आणि हेरिटेज इमारतीच्या पुनरूज्जीवन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. याशिवाय खंडाळा व महाबळेश्वरमधील इतरही महत्वपूर्ण विषयांना मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घालून मार्गी लावले आहेत, अशी माहिती माजी आमदार मदन भोसले यांनी दिली.
वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नांबाबत मदन भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवार, 19 रोजी मुंबईत भेट घेतली. या विस्तृत भेटीत मदन भोसले यांनी या तिन्ही तालुक्यातील मांडलेले प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावले. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक जीवनात समाजहिताला अनुकूल असे परिवर्तन घडवणाऱ्या प्राज्ञ पाठशाळेचे मोठे योगदान आहे. आजही या ठिकाणी दुर्मिळ पोथ्यांच्या आधारे धर्मकोशाचे काम चालते.
प्राज्ञ पाठशाळेचे अध्यक्षपद भूषवणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. मे. पु. रेगे, वसंतराव पळशीकर यांचे या इमारतील अखेरपर्यंत वास्तव्य होते. वैदिक शिक्षणासोबत पुरोगामित्वाचा वारसा जपत महाराष्ट्राच्या जडणघडणीत या संस्थेचे मोलाचे योगदान असून हेरिटेजमध्ये समावेश असलेल्या या इमारतीचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला मान्यता द्यावी, या मदन भोसले यांनी केलेल्या मागणीलाही मुख्यमंत्र्यांनी मंजुरी देत हे काम विशेष काळजीने व संस्थेच्या लौकिकाला साजेसे व्हावे यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना संबंधितांना देत असल्याचे सांगितले.
खंडाळा नगरपंचायतीच्या हद्दीतील कायरखळ पाझर तलावाशेजारी जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याची टाकी व पाइपलाइन या कामासाठी साडेपाच कोटी रुपयांच्या तसेच खंडाळा नगरपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीस मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. नवीन पाणी योजनेमुळे खंडाळा शहराला मुबलक पाणी उपलब्ध होणार असून नवीन इमारतीमुळे प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्यास मदत होणार आहे.
क्षेत्र महाबळेश्वरला पर्यटनस्थळाचा ब वर्ग दर्जा देणे अत्यंत आवश्यक असल्याचे मदन भोसले यांनी मुख्यंमंत्र्यांच्या निदर्शनास आणत तेथील वाढते पर्यटन व आवश्यक त्या सुविधांची माहिती दिली. त्याचीही नोंद घेत क्षेत्र महाबळेश्वरला ब वर्ग दर्जा देण्यास मान्यता मिळाल्याने क्षेत्र महाबळेश्वरच्या विकासाचे द्वार खुले झाले आहे.
पुलवामा येथे शहीद झालेल्या वीर जवानांच्या स्मृत्यर्थ किसन वीर कारखाना कार्यस्थळावर उभारण्यात येणाऱ्या शहिद स्मारकालाही मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असून त्यामुळे किसनवीरनगर येथे हे स्मारक उभारण्याचा मार्ग खुला झाला आहे.