मुंबई : भेंडवळची ३५० वर्षांची भविष्य परंपरा या वर्षी करोनामुळे खंडीत होईल का? असं वाटत होतं. मात्र तसं घडलेलं नाही. भेंडवळची भविष्य परंपरा कायम राहिली आहे कारण त्यांनी वर्तवलेलं भाकित आता समोर आलं आहे. यावर्षी चारही महिन्यात पाऊस सर्वसाधारण आणि चांगल्या स्वरुपात राहिल. अतिवृष्टी आणि नासाडीही होईल. पृथ्वीवर नैसर्गिक रोगराईचे संकट येईल आणि देशाची आर्थिक स्थितीही कमकुवत होईल असा अंदाज या भाकितात नोंदवण्यात आला आहे.
राजा कायम आहे, मात्र आर्थिक स्थिती खालावल्याने राजावरचा तणाव वाढेल. परकियांची घुसखोरी होईल आणि संरक्षण खात्यावर ताण राहिल. तसंच त्यामुळे त्रास सहन करावा लागेल असंही या भाकितात म्हटलं आहे. सारंगधर महाराज यांनी हे भाकित वर्तवलं आहे.
पिक अंदाजाबाबत ते म्हणतात, “ज्वारी, तूर, गहू, कपाशी, सोयाबीन यांचे पिक चांगले येईल. पहिल्या महिन्यात पेरण्या केल्या जातील मात्र चारा टंचाई भासेल. जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल. पाऊस चांगला होईल.”
साडेतीनशे वर्षांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील जामोद तालुक्यात असलेल्या भेंडवळ येथील वाघ कुळातील चंद्रभान महाराज यांनी या भविष्यवाणीला सुरुवात केली. कृषीविषयक पिकं, पर्जन्यमान, देशाचं संरक्षण, व्यापार आणि आरोग्यविषयक तसेच राजकारण याबाबत वर्षभराचे भाकित यामध्ये नोंदवले जातं. भेंडवळ येथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गावजवळच्या पूर्वेकडील वाघ शेतात मांडण्यात येणाऱ्या घटाची मांडणी व दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करुन भाकित वर्तवण्यात येतं.