वडगाव मावळ – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयाराम-गयाराम यांना भाजप संधी देणार नाही, असा ठराव मावळ तालुका भाजपने स्थानिक पातळीवर केला असल्याची माहिती तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी दिली. यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच लोणावळा व तळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये येणाऱ्यांना ब्रेक लागणार आहे.
शासकीय योजना प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती देण्यासाठी बुधवारी (दि. 16) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भेगडे बोलत होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर दळवी, माजी तालुकध्यक्ष प्रशांत ढोरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, शहराध्यक्ष अनंता कूडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा जोरदार असल्याने अनेक राजकीय पक्षातील नेते भाजपमध्ये येत आहे. आलेल्या उमेदवाराची राजकीय ताकद लक्षात घेऊन पक्षाकडून त्यांना उमेदवारीही दिली जात आहे. त्यामुळे देश आणि राज्यातील भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र मावळ तालुक्यातील भाजपने पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरूद्ध दिशेने प्रवास सुरू केला असल्याचे दिसून येते. इतर पक्षातून आलेल्या व्यक्तीला जरी वरिष्ठ पातळीवरून उमेदवारी दिली तरी मावळ तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते संबंधित उमेदवाराचे काम करणार नाही, असा ठराव झाल्याचे भेगडे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विकासकामे तसेच लोककल्याणकारी योजनांसाठी भरीव तरतूद केलेली आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम येणाऱ्या काळात
करणार आहे.
या योजनांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकत्यांसह प्रत्येक गणात प्रवास करणार असल्याचे रवींद्र भेगडे यांनी सांगितले. यामुळे मागील विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून तीव्र इच्छुक असलेले रविंद्र भेगडे पुन्हा आगामी काळातील विधानसभा निवडणुकीसाठी शासकीय योजनांच्या आधारे चाचपणी तर करत नाहीत ना? अशा प्रश्न निर्माण झाला आहे.
कारण मागील वेळेस जरी पक्षाने त्यांना संधी नाकारली असली तरी देखील त्यांनी पक्षाच्या पडत्या काळात तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी घेऊन ती यशस्वीपणे पार पाडत पक्षात कायम राहिले. त्यामुळे आगामी विधानसभेचे ते देखील प्रमुख दावेदार असणार आहेत.
“त्या’ बड्या नेत्यासाठी निर्णय?
मावळ तालुक्यातील एक बडा राजकीय नेता आगामी विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपमध्ये येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या मावळ तालुक्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे. या नेत्याला रोखण्यासाठी भाजपमधील स्थानिक नेते एकवटले आहेत. त्यातूनच आयाराम-गयाराम यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. तसेच तरी वरून उमेदवार लादण्यात आला तरी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी त्या आयात उमेदवाराचे काम करणार नसल्याचाही ठराव केला आहे.
रेल्वे उड्डाणपूल स्थलांतरित करण्याची मागणी
दोन दिवसांपूर्वी आमदार सुनिल शेळके यांनी कान्हे येथील रेल्वे उड्डाणपूल रद्द करण्याची करण्याची मागणी भाजपचे तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी केल्याचा आरोप केला होता. या आरोपास प्रतिउत्तर देताना भेगडे म्हणाले की, आम्ही स्थानिक नागरिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कान्हे येथील उड्डाणपूल स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. हा उड्डाणपूल रद्द करण्याची आमची मागणी कधीही केलेली नव्हती.