पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेबाबतही अनिश्चितता निर्माण झालेली आहे. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यास मुहूर्तच सापडत नसल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक संभ्रमात पडले आहेत.
दरवर्षी बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात येत असते. यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा एप्रिल-मे मध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत या परीक्षा घेण्याचे वेळापत्रक ही जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा हे वेळापत्रक रद्द करण्यात आले. आता मे महिन्याच्या अखेरीस या परीक्षा होतील , अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती.
वर्षभर शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंदच ठेवण्यात आली होती. ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवण्याला प्राधान्य देण्यात आले होते. दहावी व बारावी हे दोन्ही वर्ष व त्याच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या आगामी करिअरच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. परीक्षा होणार होणार असे म्हणत दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आता बारावीच्या परीक्षाचे तसेच होणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. कोरोनाच्या संकटामुळे जेईई, नीट यासारख्या प्रवेश परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. बऱ्याचशा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रकियेत बारावीचे गुण व प्रवेश परीक्षेचे गुण दोन्ही महत्वाचे असतात. त्यामुळे बारावीच्या परीक्षा या कोणत्याही परिस्थितीत झाल्याच पाहिजेत, असा आग्रह धरण्यात येत आहे.
बारावीच्या परीक्षा होणार की नाही , परीक्षा होणार असतील तर त्या कधी होणार, वेळापत्रक कधी जाहीर होणार असे अनेक प्रश्न विद्यार्थी, पालक यांच्या कडून उपस्थित करण्यात येवू लागले आहेत.
इतर विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या जून- जुलै मध्ये होण्याची शक्यता असल्याने त्या पूर्वी बारावीच्या परीक्षा होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या काळात विविध संकटाचा सामना करत विद्यार्थी अभ्यास करत आहेत. परीक्षेबाबत तळ्यात -मळ्यात अशी परिस्थिती असल्याने विद्यार्थ्यांच्या टेन्शन मध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.
शालेय शिक्षण विभाग, राज्य मंडळ यांचे बैठकांचे सत्र सुरुच आहे. कोणताही निर्णय घेण्याबाबत व ते जाहीर करण्याबाबत अधिकाऱ्यांना फारसे स्वातंत्र्य राहिलेले नाही. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडेच निर्णय जाहीर करण्याचा रिमोट कंट्रोल आहे. बारावीच्या परीक्षेसाठी सुधारित वेळापत्रक तयार करण्याचे कामकाज सुरू असून ते पूर्ण झाल्यावर वेळापत्रक जाहीर करु, असे राज्य मंडळाकडून सतत हेच सांगण्यात येत असते.