हडपसर – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात योजना राबविताना कोणत्याही प्रकारे जाती, धर्माच्या आधारावर पक्षपात केला नाही.यापूर्वी ज्या योजनांचे लाभ मिळण्यासाठी 10-20 वर्षे लागत होती त्यात पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी सुसूत्रता आणल्याने लाभार्थ्यांना न मागता लाभ मिळत आहे, असे प्रतिपादन अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी केले.
शिरूर लोकसभा मतदार संघ प्रवास योजनेअंतर्गत हडपसरमध्ये नुकतीच बैठक पार पडली. ज्यामध्ये पक्षाची संघटनात्मक संरचना, बांधणी या विषयांवर चर्चा झाली. तसेच आढावा घेण्यात आला.त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री पटेल बोलत होते.यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर, आमदार माधुरी मिसाळ, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे , लोकसभा संजोयक धर्मेंद्र खंडारे, हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी तसेच कोअर कमिटीचे इतर सदस्य आणि हडपसर मतदार संघातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी विशेष व्यक्ती म्हणून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अमनोरा सिटीचे प्रमुख अनिरुद्ध देशपांडे,तसेच मांजरी बुद्रुक येथील सन्मती बाल निकेतनच्या ममता सपकाळ यांची भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली.हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजप संघटना मजबूत आहे.तरीही सर्व स्तरावर संघटना आधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील. असे मत माजी आमदार योगेश टिळेकर यांनी यावेळी व्यक्त केले.हडपसर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संदीप दळवी यांनी प्रास्ताविक केले. तर संघटन सरचिटणीस गणेश घुले यांनी आभार मानले.