चंदिगढ : भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री कालराज मिश्रा यांनी आज भाजपाद्वारे २०१४ लोकसभा निवडणुकांवेळी देशातील जनतेच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करू अशाप्रकारचे कोणतेही आश्वासन दिलं गेलं नसल्याचं म्हंटलं आहे. विरोधी पक्षांद्वारे लोकांना भ्रमित करण्यासाठी १५ लाखांच्या आश्वासनाबाबतची चुकीची माहिती सध्या पसरविण्यात येत असली तरी भाजपतर्फे अशाप्रकारचे कोणतेही आश्वासन देण्यात आलं नव्हतं असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजपच्या ३९व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून चंदिगढ येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना माजी केंद्रीय मंत्री कालराज मिश्रा यांनी काँग्रेसद्वारे जाहीर करण्यात आलेल्या किमान उत्पन्न योजनेवर जाहीर टीका केली. ते म्हणाले, “काँग्रेसला खोटं बोलण्याची सवय असल्यानं त्यांनी सवयीप्रमाणे आणखीन एक खोटारडी योजना जाहीर केली आहे.”
या पत्रकार परिषदेमध्ये मिश्रा यांना पत्रकारांद्वारे २०१४ मध्ये दिल्या गेलेल्या १५ लाख रुपये देण्याच्या आश्वासनाबाबत विचारले असता त्यांनी, “मला एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते आणि ती म्हणजे आम्ही कधीच १५ लाख रुपये देण्याचं आश्वासन दिल नव्हतं. २०१४च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी आमच्या नेत्यांनी प्रचारसभेमध्ये म्हंटल होतं की जर विदेशात ठेवलेला भारताचा काळा पैसा परत आणला तर देशातील प्रत्येक कुटुंबाला १५ लाख रुपये वाटता येतील मात्र आमच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये याबाबत कोणतेही आश्वासन देण्यात आलं नव्हतं.” अशी प्रतिक्रिया दिली.