पाथर्डी – राजकीय द्वेषापोटी कुणी कुठेही गड उभा करू शकत असेल पण गड, गादी व महंत यापेक्षा कोणीही मोठे नाही. भगवानबाबापासून मला वेगळे करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी याच भगवानगडावर दगडफेक करण्यात आली, पण भगवानबाबा जवळ न्याय आहे. गडाचे महंत स्वतः न्यायाचार्य आहेत, अशा शब्दात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी माजीमंत्री पंकजा मुंडे यांचे नाव न घेता टिका केली.
ना मुंडे यांनी आज भगवान गडावर येवून भगवानबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी भगवान बाबा व पांडुरंगाची मूर्ती देऊन ना. मुंडे यांचा सत्कार केला. ना. मुुंडे म्हणाले, धर्मकारण व राजकारण या गोष्टी पूर्णपणे वेगवेगळ्या असायला हव्यात. गडापेक्षा कोणीही मोठे होऊ शकत नाही.
मंत्री म्हणून नव्हे तर गडाचा परमभक्त म्हणून येथे आलो आहोत. येथून पुढे भक्त म्हणूनच राहणार आहे. मठाधिपतीनी गडासाठी काही मागावे, एवढा मोठा मी निश्चित नाही. जे काही करायचे ते सेवा म्हणून करू गडावर पुन्हा सन्मानपूर्वक येण्याचे निमंत्रण मिळणे हाच भगवानबाबाचा चमत्कार वाटतो. भगवानगड एक शक्तिपीठ आहे.
मला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणार, असे महंत डॉ.नामदेव शास्त्री यांना कळल्यानंतर मुंबई येथे येऊन त्यांनी मंत्री झाल्यावर गडावर समाधी दर्शन व महाप्रसादासाठी येण्याची आज्ञा केली. गडाचे व मुंडे कुटुंबाचे अनेक पिढ्यांचे श्रद्धेचे नाते आहे.
माजीमंत्री पंकजा मुंडे समर्थकांनी पाच वर्षांपूर्वी भगवानगडावर तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वाहनावर दगडफेक केली होती. त्यानंतर भगवानगडावर भाषण बंदीचा निर्णय महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी घेतला पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडाची निर्मिती केल्यापासून महंत व पंकजा मुंडे यांच्यात मतभेद विकोपाला जाऊन भगवानगडावरील भाषणासाठीच्या अट्टाहासावरून सावरगाव येथील दसरा मेळावाचा जन्म झाला.
धनंजय मुंडे यांच्या वाहनावर दगड मारणारे पंकजा मुंडे समर्थक होते व गोपीनाथगडाची निर्मिती या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा नामोल्लेख टाळून अत्यंत खोचक व मार्मिक शब्दात टीका करत महंत डॉ. नामदेवशास्त्री यांच्या विषयी अधिक श्रद्धा व सहानुभूती व्यक्त केली.
त्यावेळी दगड मारणारे व आज क्रेनच्या साह्याने भव्य हार घालणारे बहुसंख्य कार्यकर्ते सारखेच होते. स्वागत करणाऱ्यांमध्ये बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील कार्यकर्ते अधिक होते.
सुमारे पाचशे वाहनांचा ताफा बीड जिल्ह्यातून आला होता. वेगळेच चैतन्य व घोषणांनी वातावरण बदलाचे संकेत मिळत होते. पंकजा मुंडे यांच्यासाठी कोण आली रे कोण आली महाराष्ट्राची वाघीण आली, अशी घोषणा गडावरून दुमदुमली होती. मात्र आज वाघिणीचा वाघ होऊन कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला आशा जोशपुर्ण घोषणा ऐकु आल्या.
यावेळी ऍड.प्रताप ढाकणे, संभाजी पालवे, गहिनीनाथ शिरसाट, यांच्यासह बीड जिल्ह्यातील आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संदीप शिरसागर, आमदार प्रकाश सोळंके आदींसह विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.