पीक वाचविण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना
राज्याच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांत टोळधाडीचा प्रादुर्भाव
पुणे – राज्यातील काही भागात टोळधाडीने आक्रमण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी कृषी विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने विविध माध्यमे व शेतकरी प्रशिक्षणाद्वारे जनजागृती करून संभाव्य प्रादुर्भावावर नियंत्रणाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयातील विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक नारायण शिसोदे यांनी दिल्या आहेत.
सद्यस्थितीमध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये टोळधाड आली आहे. हे टोळ मार्गातील वनस्पतीची पाने, फुले, फळे आदींचा फडशा पाडत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सध्या राज्याच्या सीमेलगत असलेल्या पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात टोळधाडीच्या प्रादुर्भावाबाबत जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे.
टोळधाडीपासून नुकसान टाळण्याच्या दृष्टीने प्रादुर्भावापूर्वीच खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाकडून माहिती घेऊन याच्या नियंत्रणासाठी क्षेत्रीय यंत्रणेने सतर्क राहावे. तसेच याबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये विविध माध्यमे त्याचबरोबर शेतकरी प्रशिक्षणाद्वारे, व्हॉट्सऍपद्वारे व्यापक जनजागृती करावी. टोळची निरीक्षणे नोंदवून आयुक्तालयाला सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.