मुंबई – अमेरिका आणि युरोपातील रिझर्व्ह बॅंका व्याजदर वाढ करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये देश -विदेशातील गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. जागतिक बाजारात त्यामुळे नकारात्मक वातावरण होते. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर हे झाला आणि शेअर बाजाराचे निर्देशांक एक टक्क्याने कमी झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 770 अंकांनी म्हणजे 1.29 टक्क्यांनी कमी होऊन 58,766 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 216 अंकांनी कमी होऊन 17,542 अंकावर बंद झाला.
केंद्र सरकारने विंडफॉल टॅक्समध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजसह इतर तेल कंपन्यांच्या शेअरच्या भावात घसरन झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज तीन टक्क्यांनी कमी झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज बरोबरच टीसीएस, सन फार्मा, टेक महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस, एनटीपीसी, टाटा स्टील या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
मात्र या नकारात्मक परिस्थितीमध्ये बजाज फिन्सर्व, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, टायटन, स्टेट बॅंक, महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात अडीच टक्क्यापर्यंत वाढ झाली. सेन्सेक्स संबंधातील 30 पैकी 23 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
युरोपमधील महागाई वाढवून 9.1% झाली आहे तर जपान मधील महागाई 24 वर्षाच्या उच्चांकावर गेली आहे. चीनमध्ये महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात वाढ करण्याचे ठरविले आहे. यामुळे जागतिक बाजारात नकारात्मक वातावरण होते. पहिल्या तिमाहीत भारताचा विकासदर तब्बल 13.5% इतका झाला आहे. असे असूनही जागतिक परिस्थिती खराब असल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले.
मोठ्या कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी झाले असले तरी छोट्या कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा मिडकॅप 0.57 टक्क्यांनी तर स्मॉल कॅप 0.48 टक्क्यांनी वाढला. दरम्यान जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर दोन टक्क्यांनी कमी होऊन 93 डॉलर प्रति पिंप या पातळीवर होते. जर कच्च्या तेलाचे दर या पातळीवर राहिले तर भारताला त्याचा फायदा होणार आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी 4,165 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.