पिंपरी (प्रतिनिधी) – तळ ठोकून बसलेल्या पावसाने अखेर निरोप घेतला असून दबक्या पावलाने थंडीचे आगमन झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिवसा चांगले ऊन पडत आहे तर रात्री आणि सकाळी वातावरणात चांगलाच गारठा जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिवसाची सुरुवात धुक्याने होत असल्याने पावसाळा आता संपला असल्याचा विश्वास नागरिकांना वाटू लागला आहे. शनिवारी सकाळी वेधशाळेने प्रकाशित केलेल्या गेल्या 24 तासांच्या अहवालानुसार पारा 17 अंशांपर्यंत खाली घसरला आहे. तर कमाल तापमान 30.2 अंशा सेल्सियस इतके होते. आद्रतेचे प्रमाण 93 टक्के इतके होते. शुक्रवारी रात्री दहा-अकरा वाजताच चांगली थंडी जाणवत होती.
यावर्षी पावसाळा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबला होता. दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधून-मधून बरसणाऱ्या सरींमुळे यावर्षी पावसाळा संपणार की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु गेल्या दोन दिवसांपासून आकाश निरभ्र असून सकाळी धुके आणि दुपारी चांगले ऊन पडत आहे. धुके पडत असल्यामुळे आता पावसाळा संपून हिवाळा सुरु झाल्याचा विश्वास नागरिकांना वाटू लागला आहे. थंडी वाढताच बाजारात, तसेच रस्त्यांवर विक्रीसाठी स्वेटर, कानटोप्या, जॅकेट दिसू लागले आहेत.
अचानकच खाली उतरलेल्या तापमान पुढील काही दिवस असेच राहणार आहे. पुणे वेधशाळेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 10 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान कमाल तापमान 31 ते 32 अंश सेल्सियस तर किमान तापमान 17 ते 18 अंश सेल्सियस इतके राहणार आहे. या दरम्यान आकाशही निरभ्र राहणार आहे.