मुंबई – एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय धोरण ठरवण्याची गरज आहे, अशी सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. पंतप्रधानांसमवेत झालेल्या एका व्हर्चुअल मिटींगमध्ये बोलताना त्यांनी ही सूचना केली.
ठाकरे म्हणाले की, करोनाचा मुकाबला करताना सार्वजनिक ठिकाणी होणारी मोठी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. त्यातून करोना प्रसाराचा धोका मोठ्या प्रमाणात उद्भवतो. ही स्थिती लक्षात घेऊन गर्दीला आवर घालणारे राष्ट्रीय धोरण निश्चित केले गेले पाहिजे, अशी सूचना ठाकरे यांनी केली.
तसेच केंद्राने दिलेल्या प्रमाणानुसार विचार करता, संभाव्य तिसऱ्या लाटेत राज्याला दररोज सुमारे 4 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आवश्यकता भासेल. आम्ही 2 हजार मेट्रिक टन उत्पादन करू शकतो. उर्वरित 2 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा नजीकच्या राज्यातून झाला तरच मोठी मदत होईल. भिलाई, जामनगर, बेल्लारी स्टील प्लांट या ठिकाणांहून एलएमओ महाराष्ट्राला मिळण्यासाठी केंद्राने सहाय्य करावे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात 530 पीएसए ऑक्सिजन प्लांट्स उभारणे सुरू असून जिल्हानिहाय ऑक्सिजन व्यवस्थापन नियोजन केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मिळून 8 ते 10 जिल्ह्यांमध्ये अध्यापही संसर्ग आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या जिल्ह्यांमधील 18 वर्षांपुढील 2.06 कोटी जणांना पूर्ण दोन्ही डोस देणे गरजेचे आहे. सध्या 87.90 लाख डोसेस इथे दिल्या आहेत. त्यामुळे जादाचे 3 कोटी डोस मिळाले तर प्राधान्याने या सर्व जिल्ह्यांत संपूर्ण लसीकरण करता येईल ते म्हणाले.
यावेळी ठाकरे यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाययोजनांच्या संबंधात मोदींना माहिती दिली. तसेच संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचीहर त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.
औषधांच्या किमती कमी करणे आवश्यक
मोनोक्लोनल अँटिबॉडीज हे सध्या उपचारांमध्ये प्रभावी आहे. मात्र, त्याची किंमत 50 ते 60 हजार प्रति डोस असून तिसऱ्या लाटेत 50 हजार रुग्णांना जरी हे औषध द्यायचे म्हटले तर 300 कोटी रुपये लागतील. याचा विचार करून केंद्र सरकारने या औषधांवर किमतीचे निर्बंध आणावेत. तसेच त्याची सहज उपलब्धता होईल हे पाहावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.