विद्युत प्रवाह त्वरित सुरू करावा
शिरापूर येथील 88 घरे आणि हिंगणी येथील काही घरे पाण्याखाली होती. शिरापूर येथील सिद्धटेक पुलाच्या जवळील झुणका भाकरीसाठी प्रसिद्ध असणारी हॉटेल तब्बल दोन दिवस पाण्याखाली होती. आता पाऊस उघडला आहे. मात्र, वीज नाही, त्यामुळे पाणी असून देखील शेतीला पाणी देता येत नाही. त्यामुळे नादीकाठच्या भागातील विद्युत प्रवाह त्वरित चालू करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
देऊळगांवराजे – गेल्या आठ दिवसांपूर्वी भीमानदीला प्रचंड पूर येऊन गेला. या पुराने दौंड तालुक्यातील बऱ्याच शेतीचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याबरोबरच महापुरामुळे नदीकाठचे विजेचे पोल पडले आहेत. वडगांव दरेकर आणि पेडगाव (ता. दौंड) येथील विजेचे ट्रान्सफॉर्मर देखील पडले आहेत. त्यामुळे नादी काठच्या बऱ्याच भागांत पाणी आहे; पण वीज नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. भीमा नदीला यावर्षी आलेल्या पुरामुळे देऊळगांवराजे (ता. दौंड) येथील बंधाऱ्याचा भराव वाहून गेला आहे, याच बंधाऱ्यावरून आर्वी (ता. श्रीगोंदा) येथे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. गेल्या बारा-तेरा दिवसांपासून येथील लोकांचा जगाशी संपर्क तुटला आहे.
श्रीगोंदा महसूल विभागाच्या वतीने तेथील नागरिकांसाठी बोटीची सोय करण्यात आली आहे; पण यालाही मर्यादा येत आहेत. पिण्यांचे पाणी लोकांना देऊळगांवराजे (ता. दौंड) येथून न्यावे लागते, तसेच तेथील मुलांना शिक्षणसाठी देऊळगांवराजे येथेच यावे लागते, त्यामुळे बेट भागातील लोकांची या बंधाऱ्याची भिंत तुटल्यामुळे चांगलीच पंचायत झाली आहे. त्यामुळे हा भराव त्वरित दुरुस्त करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
या पुरामुळे परिसरातील शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील ऊस, भाजीपाला, जनावरांचा चारापीक यांचे मोठे नुकसान झाले आहे; पण प्रशासनने अजूनही या गोष्टींचे पंचनामे सुरू केलेले नाहीत. घरांचे पंचनामे झाले आहेत; पण भरीव मदत अजून तरी संबधित लोकांना मिळालेली नाही.
नदीकाठी पाण्याचा वापसा होईल, तशी विजेची सर्व कामे पूर्ण करून परिसरातील विद्युत प्रवाह चालू करण्यात येईल.
– अमित धोत्रे, कनिष्ठ अभियंता, महावितरण, देऊळगावराजे