पुणे (संतोष गव्हाणे) -पुणे महापालिका निवडणुकी संदर्भात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली असली तरी चार ऐवजी तीनचा प्रभाग, 2011च्या जणगणना ग्राह्य धरणे, समाविष्ट गावांच्या लोकसंख्येकडे केले गेलेले दुर्लक्ष, नगरसेवक पदाची कमी होणारी संख्या याबाबी लक्षात घेता महापालिकेवर एक हाती सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाआडून ही शिंदे गट-भाजपची राजकीय खेळी तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
समाविष्ट गावे वगळण्याचा प्रयत्न…
पुणे महापालिका हद्दीत सुरूवातीला 11 गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर त्या सर्व गावांचा द्विसदस्यीय प्रभाग करून निवडणूक घेण्यात आली होती, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला एक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला एक जागा मिळाली, त्यानंतर 23 गावे पालिकेत समाविष्ट केल्यानंतर महापालिका निवडणुकीत पुन्हा एकहाती वर्चस्व ठेवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असलेली 23 गावेच महापालिकेतून वगळण्याचा प्रयत्न शिंदे गट-फडणवीस (भाजप) सरकारकडून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या 23 गावांचा समावेश पालिकेत केल्याने ही गावे वगळण्याच्या “प्लॅन’वर पाणी फिरले, त्यानंतर राज्य सरकारकडून पुन्हा चारचा प्रभाग करून निवडणूक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु, जानेवारी 2021 मध्ये काढलेल्या अध्यादेशानुसार, प्रभाग तीन सदस्यांचेच करण्यात यावेत, असे राज्य निवडणूक आयुक्त यु.एस.मदान यांनी आदेश दिले.
34 गावांत वाढणार अवघे 4 नगरसेवक…
पुणे महापालिकेत न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण 34 गावांचा पालिकेत समावेश करण्यात आला. महापालिकेत गावे वाढल्याने स्थानिक नगरसेवक त्या-त्या गावाला मिळावेत, यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पालिकेसाठीची सदस्य संख्या 173 केली होती. परंतु, ही संख्या राज्यात सत्तांतर झाल्याने शिंदे गट-फडणवीस (भाजप) सरकारने 2011च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना होत असल्याने कमी करीत नगरसेवक संख्या 166 आणली. 11 गावे समाविष्ट झाल्यानंतर 2017 मध्ये 2 नगरसेवक वाढले त्यात आता फक्त 2 ची भर पडून संपूर्ण 34 गावांत अवघे 4 नगरसेवक वाढणार आहेत, समाविष्ट गावांना नगरसेवकच मिळणार नाहीत, अशी रचना केली गेली असल्याचा आरोप आता महाविकास आघाडीतील पक्षांकडून केला जात आहे.
जुन्या प्रभागतच नव्या गावांचा समावेश…
पुणे महापालिका प्रशासनाकडून प्रभाग रचना पूर्णत: नव्याने करण्यात येत आहे. पालिकेत समावेश झालेल्या 34 गावांसह नवे प्रभाग केले जाणार आहेत. त्यातच महापालिकेने 2011च्या जनगणनेनुसार 35 लाख 56 हजार लोकसंख्या निश्चित करून तीन सदस्य संख्येनुसार प्रभाग रचना करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत. त्यामुळे नव्याने प्रभाग रचना करताना 34 गावांच्या लोकसंख्येचा स्वतंत्रपणे विचार केला जाणार नाही. जुन्या प्रभागातच त्यालगतच्या गावांची संख्या गृहीत धरून तीनचा प्रभाग केला जाणार आहे. त्यामुळे नव्याने समावेश झालेल्या गावांचा नवा प्रभाग होणार नसल्याचे स्पष्ट आहे. 34 गावांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य आहे, असे मानले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रोखण्यासाठी शिंदे गट-भाजपने तांत्रिकदृष्ट्या शह दिल्यासारखीच स्थिती निर्माण केली गेल्याचे मानले जात आहे.