प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 – भारतात मंकीपॉक्सच्या साथीचा फारसा धोका नाही. मात्र आपल्याला आवश्यक काळजी घेतली पाहिजे. खासकरून गर्दीच्या ठिकाणी जसे की कार्यालये आणि आरोग्य सुविधा केंद्रे याठिकाणी वावरताना सुरक्षेच्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे मत महाराष्ट्र राज्य “कोविड टास्कफोर्स’चे सदस्य आणि “एंडोक्राइनोलॉजिस्ट’ डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.
पुणे ऑबस्ट्रेटिक अँड गायनोकोलॉजीकल सोसायटीतर्फे (पीओजीएस) आयोजित रिप्रोडकटीव्ह एंडोक्राइनोलॉजी (एनसीआरई ) या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या’चे उद्घाटन झाले. विमाननगर येथील हयात रिजेन्सी हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्रीरोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. अलका कृपलानी या होत्या. यावेळी डॉ. पराग बिनीवाले, डॉ. मिलिंद दुगड, डॉ. चैतन्य गणपुले, डॉ. आशिष काळे, डॉ. मंजिरी वळसंगकर, परिषदेच्या समन्वयक डॉ. राखी सिंग, डॉ. अमोल लुंकड, आणि डॉ. पंकज सरोदे उपस्थित होते.
करोनाचा धोका आता तितकासा गंभीर राहिला नाही. मात्र अद्यापही विविध विकारांचे मोठे आव्हान आरोग्य क्षेत्रासमोर आहे.
विशेषतः मधुमेह, उच्चदाब यांसारख्या जीवनशैलीविषयक आजार ही एक मोठी समस्या बनली आहे. सन 2017 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात दरवर्षी 40 लाख नागरिकांचा अशा प्रकारच्या विकारामुळे मृत्यू होत असल्याचे म्हटले आहे. मात्र, सन 2019 मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात हे प्रमाण वाढून 68 लाख झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. जगभरात कार्डिओ- मेटाबॉलिक आजारांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे, असे डॉ. जोशी यांनी नमूद केले.
प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्राबाबत टीका न करता संशोधन व्हावे
प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्राबाबत बोलताना डॉ. जोशी म्हणाले, “एखाद्या रोग, आजाराबाबत संशोधन करत असताना, आपण प्राचीन भारतीय औषधोपाचार आणि पद्धती यांना धूडकावून लावणे योग्य ठरणार नाही. आपल्या वैद्यकीय पद्धतीबाबत वेगवगेळ्या काळातील प्रभावामुळे अनेक चुकीचे समज पसरवण्यात आले आहे. मात्र, आपल्या प्राचीन भारतीय साहित्यात पुष्कळ अशा गोष्टी आहेत, ज्यावर आपल्याला पुन्हा काम करण्याची गरज आहे. त्यामुळे वैद्यकीय शास्त्रज्ञ म्हणून त्यावर टीका करण्यापेक्षा, त्यातून काही चांगले विज्ञान निर्माण केले पाहिजे.’