हायकोर्टाची स्थगिती कायम
मुंबई : ठाण्यातील विविध विकासकामांच्या आड येणाऱ्या झाडांची कत्तल होऊ नये म्हणून हायकोर्टात धाव घेतलेल्या पर्यावरणवाद्यांना मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने या वृक्षतोडीला देण्यात आलेली स्थगिती आज कायम ठेवली.
त्यामुळे किमान महिनाभर तरी झाडांची कत्तल टळणार आहे.
ठाण्यातील मेट्रो प्रकल्पासाठी तसेच इतर विविध 18 विकासकामांकरिता 3880 झाडे तोडण्यात येणार आहेत. या विरोधात ठाण्यातील पर्यावरणवादी रोहित जोशी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. मेट्रोच्या कामाचा खोळंबा होऊ नये यासाठी हायकोर्टाने जानेवारी महिन्यात 3880 पैकी 1023 झाडे तोडण्यास परवानगी दिलेली आहे. इतर उर्वरित झाड तोडण्यात येऊ नयेत यासाठी पर्यावरणवाद्यांनी हायकोर्टात अपील केले आहे.