जयपुर: राजस्थानातील राजकीय घडामोडीत नवे वळण आले आहे, त्या पार्श्वभूमीवर राज्यात कॉंग्रेसमध्ये नेतृत्व बदल केला जाण्याची शक्यता काही जणांनी वर्तवली आहे. तथापि ही शक्यता प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गोविंदसिंह दोत्सरा यांनी साफ फेटाळून लावले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, राज्यात अशोक गहलोत हे मुख्यमंत्री आहेत आणि सारा पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे. आणि तेच पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील. पक्षाच्या सचिन पायलट यांच्या बरोबर गेलेल्या 18 आमदारांना कॉंग्रेस मध्ये पुन्हा प्रवेश देण्यास पक्षाच्या काहीं आमदारांना विरोध दर्शवला आहे. त्या विषयी विचारले असता प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पक्षातील आमदारांना त्यांची मते मांडण्याची पुर्ण मोकळीक आहे.
त्यानुसार काहींनी हे मत व्यक्त केले असले तरी बंडखोर आमदारांच्या संबंधात काय निर्णय घ्यायचा तो निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील, पक्षाचे श्रेष्ठी या संबंधात त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो पक्षासाठी योग्यच असेल असे ते म्हणाले.
सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थकांसांठी पक्षाची दारे उघडी आहेत काय असे विचारता ते म्हणाले की ही दारे त्यांच्यासाठी कधीच बंद नव्हती, आम्ही त्यांना बाहेर घालवलेले नाही ते स्वत:च आमच्यातून दूर पळून गेले होते अशी टिपण्णीही त्यांनी केली.