जालना – राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत सध्यातरी नाही, मात्र सणासुदीच्या काळात होणाऱ्या गर्दीमुळे करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. पण लसीकरणाचा वेग वाढवल्यास संक्रमण जास्त होणार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते जालन्यात बोलत होते.
टोपे म्हणाले, राज्यात सध्या दररोज 13 ते 14 लाख जणांना लस देण्यात येत आहे. राज्यात डेल्टाची रुग्णसंख्या सध्या स्थिर आहे. नागरीकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. दररोज 15 ते 20 लाख लसीकरण करण्याचा आरोग्य विभागाचा मानस असून आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करून घेण्यासाठी फिरत असल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, 25 आणि 26 तारखेला आरोग्य विभागाकडून गट क आणि ड या पदासाठीच्या 6 हजार 200 जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रावर जॅमर बसवले जाणार आहे. जॅमर बसवल्यामूळे परीक्षेदरम्यान कॉपी सारख्या प्रकाराला आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पडेल असेही ते म्हणाले.