ना पीएमपी ना एसटी महामंडळाचे लक्ष
चिंबळी- मोठ्या प्रमाणात रहदारी वाढत असलेल्या आळंदी व चाकण शहराला आजही थेट जोडणारी पीएमपीएमएल व एसटी बससेवा उपलब्ध नसून प्रवाशांना नाईलाजाने खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. यामुळे जीव धोक्यात घालण्याबरोबरच खिशाला देखील झळ सोसावी लागत आहे.
काही वर्षांपूर्वी पीएमपीने मार्केट यार्ड ते चाकण व्हाया आळंदीमार्गे बस रूट क्र.65 ही बससेवा सुरू करण्यात आली होती, त्यामुळे प्रवाशांना थेट पुणे मार्केट, आळंदी व चाकणमार्केट अशा सुरूळीत सेवेचा लाभ अनेकांना मिळत होता; मात्र 2008 मध्ये आळंदी-चाकण घाटात रात्री काही समाजकंटक लुटारूंनी ही बस लुटण्याचा प्रयत्न केला व त्यावेळेस रस्ते अतिशय खराब असल्याचे कारण पुढे करीत ही सुरूळीत सुरू असलेली व अधिकचा नफा मिळवून देणारी बससेवाही तत्कालीन अधिकाऱ्यांणी रद्द केली. त्यामुळे गेली 10 वर्षांपासून या मार्गावर बससेवा नसल्याने नियमित हजारो प्रवासी खासगी वाहनांतून आपला जीव धोक्यात घालुन प्रवास करीत आहेत.
खासगी वाहनांतून प्रवास म्हणजे “हम करोसो कायदा’ असे म्हणत जादा पैसे घेणे, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी भरणे याप्रकाराच्या त्रासाला प्रवासी वैतागले असून, या मार्गावर पुर्ववत 65 नंबरची मार्केट यार्ड ते चाकण व्हाया आळंदीमार्गे बस पुन्हा सुरू करावी किंवा फक्त आळंदी ते चाकण बससेवा सुरू व्हावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. सध्या रस्ते चांगले आहेत, लोकवस्ती वाढलेली आहे, प्रवाशांची वर्दळ वाढलेली आहे तसेच या मार्गावर राज्य परिवहन मार्गाची देखील एकही बस सुरू नाही, तरी पीएमपीने या मार्गावर पुर्ववत 65 नंबरची लवकरात लवकर सुरू केल्यास ती पीएमपीसाठी नफ्याची ठरेल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
- राजगुरूनगर ते पुणे स्टेशन ही बंद
राजगुरूनगर ते पुणे स्टेशन मार्ग क्रं. 357 बससेवा गेल्या दीड वर्षांपासून बंद केली असल्याने राजगुरूनगर-चाकण-कुरुळी-चिंबळी-मोशी परिसरातील प्रवाशांना भोसरी येथे जाऊन दुसरी बस करावी लागत असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे, तर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर राजगुरून ते चिंबळी फटापर्यंत काही ठिकाणी बसथांब्यावर प्रवाशांना बसण्यासाठी निवाराशेड नसल्याने बारमही महिने उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे.