सांगवी-वडगाव रस्त्यावरील खापरे ओढ्यावरील पूल वादात अडकला
वडगाव मावळ – येथील सांगवी-वडगाव रस्त्यातील खापरे ओढ्यावरील नवीन पुलाचे व रस्ताचे काम शेतकऱ्यांच्या वादात रखडले आहे. सांगवी (ता. मावळ) येथील ग्रामस्थांच्या नशिबात खडतरच रस्ता असल्याचे बोलले जात आहे. पूल व रस्त्याच्या कामासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्याने काम रखडले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
मावळात होणाऱ्या संततधारेने खापरे ओढ्याला पूर आल्याने रस्ताच पाण्याखाली गेल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने सांगवीच्या ग्रामस्थांनी रस्त्यावर येणारे पाणी अडविण्यासाठी “जेसीबी’च्या सहाय्याने काम करताना गुरुवारी (दि. 11) स्थानिक शेतकरी व सांगवी ग्रामस्थांचा वाद पेटला. या वेळी निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष देसाई यांनी घटनास्थळी धाव घेत वाद मिटविला. पुन्हा पावसाची संततधार सुरूर झाल्यावर रस्त्यावर पाणी येणारच त्यासाठी रस्त्याचा कायमचा वाद मिटविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
मावळात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुलाच्या परिसरात तसेच रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सांगवीच्या ग्रामस्थांना गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक पूल व रस्त्यावरून खडतर प्रवास करावा लागत आहे. यावर्षी पूल व रस्ता झाल्यावर सुखरूपपणे प्रवास करता येईल, या आशेवर पाणी फिरल्याने ग्रामस्थ गुरुवारी (दि. 11) आक्रमक होवून स्थानिक शेतकरी व प्रशासन आदींनी संताप व्यक्त करताना, परिस्थिती हाताळण्यासाठी महसूल व पोलीस घटनास्थळी हजर झाल्याने वाद मिटला; पण पुलाचे व रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थांचा खडतर प्रवास सुरूच आहे.
स्थानिक शेतकऱ्यांने रस्त्यावर सोडलेले ओढ्याचे पाणी व पुलाचे व रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी काशिनाथ तोडकर, सोपान खांदवे, मारुती तोडकर, अमित ओव्हाळ, महादू खांदवे, बारकू खांदवे, युवराज तोडकर, सुनील खांदवे, शरद खांदवे, दीपक तोडकर, तानाजी खांदवे, विलास पवार, महेश ओव्हाळ, दिनेश पगडे, सचिन पगडे ग्रामस्थांनी केली.