नगर – दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत: संभाजीनगरसाठी आग्रही होते. त्यांनीच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केलेला आहे. त्यामुळे शिवसेना त्या मुद्यावर ठाम असून, औरंगाजेबाविषयी कुणालाही प्रेम असण्याचे कारण नाही, अशी ठाम भूमिका शिवसेना नेते तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे स्पष्ट केली.
नगरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. औरंगाबाद, अहमदनगर आणि उस्मानाबाद शहरांविषयी सुरू असलेल्या नामांतरच्या विषयावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. दिवंगत शिवसेनाप्रमुख स्वतः संभाजीनगरसाठी आग्रही होते. त्यांच्या भाषणात त्यांनी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर, असाच केला आहे. त्यामुळे शिवसेना संभाजीनगरच्या मुद्यावर ठाम आहे. या भूमिकेत बदल होणार नाही.
तसेही औरंगजेबाविषयी कोणालाही प्रेम असण्याचे कारण काय?’’ ‘ईडी’सारख्या चौकशीच्या मुद्यावर मंत्री शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. या संस्थांनी विश्वासार्हता जपायला हवी. त्यांचा राजकीय वापर होणार नाही, याची काळजी त्यांनीच घ्यायला हवी. अन्यथा देशातील जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडून जाईल, असे ते म्हणाले. राज्यपालांच्या मुद्यावर हा गैरसमजाचा मुद्दा झाला. यातून भाजपने राज्यात गैरसमज पसरवू नयेत, अशीही भूमिका त्यांनी मांडली.