नवी दिल्ली – अदानी प्रकरणात व्यापक चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय चौकशी समिती हाच एकमेव उपाय आहे. या प्रकरणातील चौकशीसाठी जी तज्ज्ञांची समिती नेमली जाणार आहे त्यातून सरकारला क्लीन चिट देण्याचेच काम होईल आणि मुख्य विषय दाबला जाईल, असे कॉंग्रेसने म्हटले आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, कॉंग्रेसने जेपीसीची मागणी मागे घेतली तर भाजप राहुल गांधींच्या माफीचा विषय मागे घेईल, असा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे, तथापि, जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय चौकशी समितीच्या मागणीवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि राहुल गांधी यांच्या माफीचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आज एका पत्रकार परिषदेत जयराम रमेश यांनी कॉंग्रेसची ही भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने 2 मार्च रोजी जी तज्ज्ञांची समिती नेमली आहे, त्या समितीच्या अखत्यारीत केंद्रीय यंत्रणा येत नाहीत. त्यामुळे त्या चौकशीतून सरकारला क्लीन चिट देण्याखेरीज काहीही काम होणार नाही.
दरम्यान, हम अदानी के है कोन या प्रश्न मालिकेतील शंभरावा प्रश्न आज जयराम रमेश यांनी सरकारला विचारला आहे. या आधी सरकारला अदानी गैरव्यवहाराच्या अनुषंगाने 99 प्रश्न विचारले आहेत. आजच्या शंभराव्या प्रश्नात त्यांनी विचारले आहे की, केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या असंख्य तपास यंत्रणांचा तुम्ही देशहितासाठी अदानींच्या चौकशीसाठी वापर करणार आहात का?. ते म्हणाले, अदानी प्रकरणात अनेक महत्त्वाचे विषय गुंतले असून त्या सर्व विषयांच्या अनुषंगाने जेपीसी हाच सगळ्यात समर्पक पर्याय असल्याने आम्ही त्यावर कसलीही तडजोड करणार नाही, असेही रमेश यांनी यावेळी सांगितले.