मुंबई : मुस्लिमांना आरक्षण देण्याचा कोणताही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारपुढे नाही, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे आघाडी सरकारमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्र सरकार मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देणार असल्याचे नुकतेच जाहीर केले होते. याबाबत सरकार लवकरच कायदा करेल असे त्यांनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी हे विधान केले. ठाकरे म्हणाले, मुस्लिम आरक्षणाबाबत माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आल नाही. प्रस्ताव आल्यानंतर आम्ही त्याच्या वैधतेचा मुद्दा तपासून पाहू. आम्ही अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. विधान भवनात मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. त्यामुळे भाजपाच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी त्या मुद्द्यावर गळा काढणे आता थांबवावे.
या मुद्द्यावर जे विनाकारण आपली शक्ती वाया दडवत आहेत. त्यांनी हा मुद्दा चर्चेला येईल त्यावेळेसाठी ती राखीव ठेवावी. हा मुद्दा आमच्यासमोर अद्याप आलेला नाही.तो ज्यावेळी येईल त्यावेळी पाहु. शिवसेनेची भूमिकाही आम्ही जाहीर केली नाही. हा मुद्दा ज्यावेळी समोर येईल त्यावेळी आम्ही त्याची कायदेशीर वैधता तपासू आणि निर्णय घेऊ. हा मुद्दा समोर येईल त्यावेळी शिवसेना आपली भूमिका घेईल, असे त्यांनी सांगितले.
रश्मी ठाकरे यांची सामनाच्या संपादकपदी नियुक्ती केल्याबद्दल ते म्हणाले, मुख्यमंत्रीपद अनपेक्षितपणे मिळाल्याने मी सामनाचे संपादकपद सोडले. सामना, शिवसेना आणि ठाकरे एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. रश्मी संपदक झाल्याने सामनाची भाषा सौम्य होईल अशी अटकळ बांधली जाते. मात्र, तसे काही होणार नाही. मी सांगू इच्छितो, सामनाची भाषा तीच राहील. संपादकीय जबाबदारी संजय राऊत यांच्याकडेच कायम राहील. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे. हे वृत्तपत्र शिवसेनेची धोरणे आणि माझे विचार मांडेल. मात्र त्यात संपादकीय स्वातंत्र्य असेल. त्यामुळे उद्या रश्मी ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली असे म्हणू नका, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
आपण आयोध्येला सात मार्चला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझी श्रध्दा आहे म्हणून मी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी जात आहे. त्यात रामाच्या नावाने राजकारण करण्याचा प्रश्न येतोच कुठे? कॉंग्रेस किंवा अन्य कोणत्या पक्षाशी तुम्ही आघाडी केली म्हणून देवाचे दरवाजे तुमच्यासाठी बंद होत नाहीत. त्यामुळे दर्शनाला कधी जायचे हा प्रश्न माझा आहे.
दिल्ली हिंसाचाराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख म्हणाले, अशी दंगल होऊ नये म्हणून मुंबई आणि महाराष्ट्रात प्रतिबंधात्मक उपाय केले गेले. पोलिस आणि नागरिक यांनी दाखवलेल्या सजगतेसाठी मी आभारी आहे. त्यांना माहिती आहे हे कोण घडवत आहे. या त्यांच्या उत्तरावर तुमचा रोख कोणाकडे आहे, असे त्यांना विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले,समझनेवालोंको इशारा काफी है. इशारा नही किया तोभी सब समझते है.