भाजप, काही संघटनांकडून जनतेची दिशाभूल
पुणे – महावितरणच्या खासगीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही अपयशी झाल्याच्या नैराश्यातून महावितरणच्या सोळा विभागाच्या खासगीकरणाबाबत भाजप वावड्या उठवीत आहे, अशी स्पष्टोक्ती ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिली आहे.
खासगीकरणविषयक वृत्त जनतेची निव्वळ दिशाभूल करणाऱ्या असून असा कोणताही प्रस्ताव कोणत्याही पातळीवर महावितरण किंवा राज्य शासनाच्या विचाराधीन नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपसारखे राजकीय पक्ष किंवा काही संघटना स्वार्थी व राजकीय हेतूने प्रेरित होऊन अशा अफवा पसरवित आहेत आणि जनतेने यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही डॉ. राऊत यांनी केले आहे. महावितरणच्या काही विभागांचे खासगीकरण करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडी सरकार व माझ्याविरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी हे षड्यंत्र रचण्यात आलेले नाही ना, अशी शंका या निमित्ताने येत असल्याचे ते म्हणाले.
जनोपयोगी निर्णय व धोरण आखल्याने ऊर्जा विभागात स्वार्थ असलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहे. भारतीय जनता पार्टीने देशात सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा सपाटा लावला असून अनेक सार्वजनिक उद्योग मोडीत काढत भांडवलदारांच्या खिश्यात घातले असल्याचे त्यांनी नमूद केले.