नवी दिल्ली – अगोदरच रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत कमी होत असताना गेल्या आठवड्यात फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.75 टक्क्यांची वाढ केल्यानंतर भारतीय रुपयाचे मूल्य वेगाने कमी होत आहे. मात्र यामुळे चिंता करण्याची कसलीही गरज नाही. सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारताकडे मुबलक परकीय चलन साठा आहे असे आर्थिक व्यवहार सचिवांनी म्हटले आहे.
या विषयावर विरोधी पक्षांनी बरीच टीका केली आहे. त्याचबरोबर वृत्त माध्यमातून उलट सुलट बातम्या येऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक व्यवहार सचिव अजय शेठ यांनी सांगितले की, सध्याच्या जागतिक चलन बाजारातील परिस्थितीचा भारतावर परिणाम होणार असे चुकीचे वृत्त पसरविले जात आहे. मात्र त्यात काही तथ्य नाही. भारत सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे समर्थ आहे. यासाठी भारताकडे आवश्यक इतके परकीय चलन आहे.
त्यामुळेच गेल्या सहा महिन्यांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर कसलाही परिणाम झालेला नाही. सात आठवड्यापासून भारताकडील परकीय चलनाचा साठा कमी होत आहे. सध्या भारताकडे 545 अब्ज डॉलर आहेत. सहा महिन्यापूर्वी भारताकडे 645 अब्ज डॉलर होते. डॉलर वधारत असल्यामुळे आणि रुपया घसरत असल्यामुळे भारतातील परकीय गुंतवणूक परत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यापर्यंत परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात रक्कम काढून घेतली होती.
आता पुन्हा अमेरिकेने व्याजदरात वाढ केल्यामुळे आणखी रक्कम काढून घेतली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत परकीय चलन साठा कमी होऊन रुपयाचे मूल्य आणखी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र गेल्या आठवड्याचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जगातील इतर चलनाच्या तुलनेत भारतीय रुपयाने उत्तम कामगिरी केली असल्याचे सांगतिले.
आगामी काळातही भारतीय रुपयावर जास्त परिणाम होणार नाही. कारण भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट आहे असे त्यानी सांगितले होते. सध्याच्या घडामोडीचा भारतावर जास्त परिणाम होणार नसला तरी रिझर्व्ह बॅंक आणि अर्थ मंत्रालयाचे परिस्थितीकडे बारीक लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. रिझर्व्ह बॅंकेने रुपयांच्या माध्यमातून व्यवहार करण्याची यंत्रणा कार्यान्वित केले आहे.