नवी दिल्ली – देशाच्या काही भागात कोविडची प्रकरणे पुन्हा नव्याने वाढत असल्याचे निदर्शनाला आले आहे. तथापि त्यामुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. आणि कोविडचा कोणताही नवीन व्हेरियंट अस्तित्वात आलेला नाही असा दिलासा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. बुस्टर डोस घेण्या विषयीची निष्काळजी आणि कोविड नियमांच्या पालनाविषयी दाखवली जाणारी बेफिकीरी यामुळे काही भागात कोविड रूग्णांचे प्रमाण वाढले आहेत.
देशातील 17 जिल्ह्यांमध्येच कोविडचा पॉझीटीव्हीटी रेट 10 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यातील सात जिल्हे केरळातील आहेत. मिझोराम मधील पाच जिल्हे आहेत. 24 जिल्ह्यांमध्ये पाच ते दहा टक्के इतका पॉझिटीव्हीटी रेट आहे. त्यात महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे.
नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले की, देशात कोविड केसेस वाढत असल्या तरी कोणताही नवीन व्हेरियंट येथे आढळून आलेला नाही. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. ते म्हणाले की कोविड विषयक निर्बंध उठवण्यात आल्याने लोकांची मुव्हमेंट वाढली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवासाची गर्दीही वाढली आहे.
त्यामुळे काहीं ठिकाणी कोविड केसेस वाढलेल्या दिसून आल्या आहेत पण त्याची फार धास्ती घेण्याची गरज नाही. तथापि अजून कोविडचे अस्तित्व आपल्या भोवती आहे याची काळजी घेतली गेली पाहिजे. लोकांनी मास्क वापरणे सोडून दिले आहे. पण गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरलाच पाहिजे असे ते म्हणाले.