बीजिंग: चीन आणि भारतामध्ये कुणी तिसऱ्याने मध्यस्थी करायची गरज नाही, अशा शब्दांत चीनने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे झाओ लिजियन यांनी शुक्रवारी दैनंदिन पत्रकार परिषदेत बोलताना अमेरिकेच्या मध्यस्थीच्या ऑफरवर ही टिप्पणी केली. ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत भारताने अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या दाव्यानंतर भारत-चीनबरोबरचे सर्व वाद शांततेच्या मार्गाने चर्चेतून सोडवत आहे. अशी सावध प्रतिक्रिया भारतातर्फे देण्यात आली होती. पण चीनने मात्र अमेरिकेचे म्हणणे स्पष्ट शब्दांत धुडकावले आहे. आमच्यातला सीमावाद सोडवण्यासाठी आम्हाला तिसऱ्या कुणाची आवश्यकता नाही, असे चीनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत चीनचे सरकारी माध्यम असलेल्या ग्लोबल टाईम्सने छापलेल्या लेखात दोन्ही देशांना अशा कुठल्याही मदतीची किंवा तिसऱ्याच्या मदतीची गरज नसल्याचे म्हटलेले आहे.
भारतानेही चर्चेचा दावा फेटाळला
मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो. तेव्हा ते त्या मोठ्या वादग्रस्त मुद्द्यावरून नाखूष दिसले. मी त्या दोन देशांमधल्या सीमावादावर मध्यस्थीला तयार आहे, असे ट्रम्प म्हणाले होते. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये कुठलीही चर्चा नजीकच्या काळात झालेली नाही, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.