निगडी – पद मिळते अन जातेही. याची खंत मनी न ठेवता सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतमातेची सेवा निःस्वार्थ बुद्धीने केली पाहिजे. यासाठी यापुढील काळात सामाजिक कार्यकर्त्यांनी झोकून काम केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मविभूषण अण्णा हजारे यांनी केले.
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीने राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांची भेट घेतली. सामाजिक कार्यकर्त्यांची यापुढील काळात कशी भूमिका असली पाहिजे यावर विचारमंथन केले. या वेळी अण्णा हजारे बोलत होते.
या वेळी हिवरे बाजार येथे जाऊन पद्मश्री पोपटराव पवार यांचीही सदिच्छा भेट घेतली. पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, सामाजिक जाणीवा समृद्ध होणे आवश्यक आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजाला नवीन दिशा देणारे काम अभिप्रेत आहे, अशा भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र शासनाचा कामगारभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कवी, लेखक राजेंद्र वाघ यांना अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांनी शुभाशीर्वाद दिले. या प्रसंगी नांदेड येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. जगदीश कदम, प्रा. डॉ. विठ्ठल एरंडे, कवी भरत दौंडकर, डॉ. दत्तात्रय जगताप उपस्थित होते. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले.