सुधा चंद्रन यांनी टीव्ही मालिका गाजवल्या पण बऱ्याच मोठ्या कालावधीमध्ये त्यांना मोठ्या पडद्यावर कोणताही रोल साकारताना बघितले गेलेले नाही. सर्वात शेवटी 2006 मध्ये “मालामाल वीकली’मध्ये सुधा चंद्रन दिसल्या होत्या. हा रोल प्रेक्षकांना खूपच आवडला होता. मात्र त्यानंतर सुधा चंद्रन यांना कोणताच सिनेमा मिळाला नाही. एका इंटरव्ह्यूमध्ये सुधाजींनी आपल्याला कोणताच सिनेमा दिला जात नसल्याबद्दलची खंत बोलून दाखवली.
कमी काम करण्यामागील नेमके कारण काय? असे विचारले असता, निर्मात्यांकडून कोणी काही ऑफर देतच नाही, असे निराशाजनक उद्गार सुधाजींनी दिले. “मालामाल वीकली’मध्ये अनेक पुरुष व्यक्तिरेखा होत्या आणि त्यामध्ये एकच महिला होती. म्हणूनच प्रेक्षकांना तो रोल आवडला असावा.
सुधा चंद्रन यांनी अनेक सिनेमे नाकारले असावेत, असा अनेकांचा अंदाज आहे. मात्र सत्यस्थिती बरोबर उलटी आहे. आपल्याला कोणी काही ऑफर देतच नव्हते, हे खरे आहे. बऱ्याच सिनेमांमध्ये असे रोल होते की जे सुधा चंद्रन सहज साकारू शकत होत्या. मात्र त्या रोलसाठी निर्मात्यांकडून सुधा चंद्रन यांच्या नावाचा विचार झाला नाही. हेच खरे आहे.
“नाचे मयुरी’या स्वतःच्याच जीवनावरील सत्यकथेवरील सिनेमातून प्रकाशझोतात आलेल्या सुधा चंद्रन यांनी अपघातापूर्वी नृत्य आणि नंतरच्याकाळात हिंदी कॉमेडी सिरीयलही केल्या. त्यांच्याबरोबर फारुख शेख आणि शेखर सुमन यांच्यासारखे गाजलेले कलाकार काम करत असत. पण तरिही सुधा चंद्रन यांना दुर्लक्षिले जावे, हे दुर्दैव आहे.
सध्या सुधा चंद्रन “ये है मोहोब्बतें’ या सिरीयलमध्ये काम करत आहेत. त्यापूर्वी त्या “नागिन’मध्ये होत्या. सिरीयलमध्येकाम मिळणे आणि सिनेमात काम न मिळणे या दोन्हींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.हे देखील त्यांनी स्पष्ट केले.