मुंबई – राष्ट्रीय आरोग्य मिशन योजनेविषयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणतात तशी वस्तुस्थिती नसून आरोग्य खात्यात कोणत्याही गैरव्यवहार झालेला नाही. या योजनेसंदर्भात गेल्या महिन्यात गडचिरोली भागातून माहिती प्राप्त झाली होती.
गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक जयस्वाल यांना याप्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याचे व दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू असल्याने या मिशनमध्ये काही घोटाळा झाला, असे म्हणता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय आरोग्य मिशन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून 400 कोटींचा गैरव्यवहार होत असल्याचे म्हटले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रासंदर्भात वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.
राजेश टोपे यांनी कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे. राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागात कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत विविध विभागांच्या अभिप्रायाने सामान्य प्रशासन विभागामार्फत सर्वसमावेशक धोरण करण्याचे प्रस्तावित आहे, असे म्हटले.
महाविकास आघाडी सरकारचा सर्व गोष्टी विचारपूर्वक चालू करण्याचा प्रयत्न आहे. आता अमेरिका, युरोपमध्ये परत लॉकडाऊन करावे लागत आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगून पावले उचलावी लागतात. सर्व गोष्टी लगेच चालू करताना विचार करुन निर्णय घ्यावे लागतात, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.