नवी दिल्ली – दिल्लीत करोनाचे रूग्ण वाढत असले तरी या शहरात अजून तरी लॉकडाऊन लागू करण्याचा प्रस्ताव आम्ही विचारात घेतलेला नाही असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की शनिवारी शहरात करोनाचे सुमारे 22 हजार नवीन रूग्ण आढळून आले आहेत. ही गंभीर स्थिती आहे. तथापि लोकांनी घाबरून न जाता मास्क लावणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले आहे. जो पर्यंत लोक मास्क लावत आहेत तो पर्यंत लॉकडाऊन लावण्याची गरज नाही. पण लोकांकडून जर त्यात काही कसूर होत आहे असे दिसून आले तर मात्र लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे त्यांनी म्हटले आहे.
लोकांना कमीत कमी त्रास व्हावा आणि त्यांचे दैनंदिन आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू राहावेत यासाठी कमीतकमी निर्बंध लागू करण्याचे आमचे धोरण आहे असे त्यांनी म्हटले आहे.
लोकांमध्ये करोना रूग्णांचे प्रमाण वाढत असले तरी रूग्णांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले की दुसऱ्या लाटेत 7 मे 2021 रोजी सर्वाधिक 20 हजार रूग्ण एका दिवसांत आढळून आले होते पण त्यात मृत्युचे प्रमाण 341 इतके होते काल शनिवारी दिल्लीत जवळपास तेवढेच रूग्ण आढळून आले आहेत पण मृत्युचे प्रमाण केवळ 7 इतके आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.
दिल्लीत करोनामुळे एकही रूग्ण दगावता कामा नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असेही त्यांनी सांगितले. सध्या दिल्लीतील रूग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रूग्णांची संख्या केवळ 1500 इतकी असल्याचेही त्यांनी सांगितले.