मुंबई: गेल्या काही महिन्यापासून भारतातील वाहन बाजारात मंदी असल्यासारखी परिस्थिती आहे. प्रवासी वाहनांबरोबरच व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत घट होत असल्याचे चित्र बाजारात निर्माण झाले आहे. जीएसटी कमी करणे आणि इतर उपाययोजना करण्याची सूचना वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या सिआमने सरकारला केली आहे. मात्र या परिस्थितीतही लक्झरी कारच्या विक्रीवर फारसा परिणाम झालेला नाही असे दिसून येते.
बीएमडब्ल्यू कार कंपनीचे हंगामी अध्यक्ष हॅन्स ख्रिश्चन बर्टेल्स यांनी सांगितले की, बीएमडब्ल्यू च्या विक्री मध्ये फारसा फरक पडलेला नाही. सरलेल्या वर्षात या आमच्या विक्रीत 13 टक्क्यांची वाढ होऊन ती 11,105 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी या कंपनीने 9800 इतक्या कार विकल्या होत्या. एक्स 5 एसयुव्ही कारच्या सादरीकरणानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, चौथ्या तिमाहीतही आम्ही विक्रमी 2982 इतक्या कार विकल्या आहेत.
काही महिन्यापूर्वी भारतात सादर करण्यात आलेल्या बीएमडब्ल्यू मिनी कारच्या विक्रीत ही 18 टक्क्यांची वाढ होऊन ती 160 युनिट एवढी झालेली आहे.
त्याचबरोबर कंपनीने बीएमडब्ल्यू मोटॉर्रडच्या 597 बाईक्स विकल्या असल्याचे त्यांनी सांगितले. कंपनीने मेक इन इंडिया वर भर देत भारतात गुंतवणूक केली असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील उच्च मध्यमवर्गाची संख्या वाढत असल्यामुळे लक्झरी कारची मागणी आगामी काळातही वाढणार असल्याचे त्यांनी
पत्रकारांना सांगितले.