सुप्रिया सुळे यांची नाव न घेता नरेंद्र मोदी यांच्यावर टीका
पुणे – “महाराष्ट्रात आल्यावर पवारांचे नाव घेतल्याशिवाय हेडलाईन होत नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबावर बोलतात. अशांचे मी जाहीर आभार मानते,’ अशा शब्दांत बारामतीतील आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता
टीका केली.
“बाहेरून येणारा कोणताही नेता दुष्काळावर बोलत नाही. निवडणुकांपेक्षा दुष्काळाचा प्रश्न मोठा असून, माझ्या प्रत्येक भाषणात दुष्काळ आणि सुशिक्षित बेरोजगारी या दोन विषयांवर बोलत असल्याचे त्यांनी नमूद केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा आघाडीला काय फायदा होणार, प्रत्येक नेता बारामती आणि पवारांवर टीका करतात, याबाबत सुळे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, “अतिथी देवो भव’ ही आपली संस्कृती आहे.
बारामती जागाच अशी आहे, की प्रत्येकाला याठिकाणी यायला आवडते. त्यामुळे प्रत्येकाचे मी स्वागतच करते. भाषणे ही फायद्या-तोट्याची नसतात तर राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी असतात. आता आमच्यावर टीका करायला काहीच राहिले नाही. त्यामुळे राज ठाकरेंवर टीका केली जात आहे. यावेळी मावळमधील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराला जाणार’ असल्याचे सुळे यांनी नमूद केले.