मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्याकडे देश यांच्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याची धक्कादायक बाब उघड झाल्याने ईडीची कारवाई आणि देशमुख यांच्यावर झालेली अटकेची कारवाई यांबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, परमबीर सिंह यांच्याकडे कोणतेही पुरावे नसल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात परमबीरसिंह यांनी नमूद केल्याच्या माहितीला माजी पोलीस आयुक्तांच्या वकिलाने दुजोरा दिला आहे.
परमबीर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र पाठवून देशमुख यांच्यावर आरोप केले होते.यात देशमुखांवर खंडणी वसुलीचा आरोप केला होता. याच पत्राच्या आधारे ईडी आणि सीबीआयमार्फत अनिल देशमुख यांची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यात देशमुख यांना अटकही करण्यात आली.
परमबीर यांच्या आरोपांची राज्य सरकारनेही निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदिवाल यांच्या एकसदस्यीय आयोगाद्वारे चौकशी सुरू केली. या आयोगासमोर परमबीर यांनी वकिलामार्फत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात देशमुख यांच्याविरुद्ध आणखी कोणताही पुरावा माझ्याकडे नसल्याचे परमबीर यांनी नमूद केले आहे.
सिंग यांच्या वकिलांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. परमबीर यांनी हे प्रतिज्ञापत्र गेल्या सुनावणीच्यावेळी आयोगासमोर सादर केलं आहे, असेही या वकिलांनी सांगितले.
विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनीही याबाबत महत्त्वाची माहिती दिली. परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्याविरुद्ध जे पत्र लिहिलं आहे त्यापलीकडे कोणताही पुरावा देण्यास नकार दिला आहे, असे हिरे यांनी सांगितले. परमबीर या प्रकरणात उलटतपासणीसही तयार नसल्याचे हिरे परमबीर हे अद्याप एकदाही चौकशी आयोगासमोर हजर झालेले नाहीत.
आयोगाने सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल आतापर्यंत तीनवेळा परमबीर यांना दंड ठोठावला आहे. दुसरीकडे परमबीर यांच्याविरुद्ध खंडणीसह गंभीर गुन्हे दाखल असून मुंबई व ठाणे येथील कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावलेले आहे.